पुणे: पोलीस किंवा न्यायालयीन चौकशी झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीला जामीन नाकारणे योग्य नाही. प्रत्येक व्यक्तीला जामीन मिळविण्याचा अधिकार आहे. हाच न्याय राष्ट्रवाद काँग्रेसचे माजी नेते छगन भुजबळ यांनाही लागू होतो. त्यामुळे लवकरात लवकर भुजबळांना त्वरीत जामीन मंजूर करण्यात यावा, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
धनगर समाजाच्या विविध प्रश्नांवर आधारित घेण्यात आलेल्या पत्रकार परिषद आ़योजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत धनगर समाजासह ओबीसी समाजाचे नेते देखील उपस्थित होते. आंबेडकर म्हणाले, वारंवार भुजबळांच्या जामीनासाठी ओबीसी समाजातील नागरिकांनी वारंवार पाठपुरावा करुन देखील त्यांना न्याय मिळत नसल्याने ते हवालदिल झाले आहेत. या समुदायाने त्यासंदर्भात माझी भेट घेतली. त्यांना मी याप्रकरणात मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच धनगर समाजाला भारिप महासंघाचा पाठिंबा असेल. त्याचप्रमाणे आगामी काळात धनगर व ओबीसी समाजासह दुखावलेल्या सर्व समाजाला सोबत घेऊन निवडणुका लढविण्याचे संकेत देखील त्यांनी यावेळी दिले. याबाबत पंढरपुर येथे २० मे रोजी होणाऱ्या राज्यव्यापी महामेळाव्यात पुढील निर्णय घेण्याचे सुतोवाच आंबेडकरांनी या पत्रकार परिषदेत दिले.