पालघर : विरार-डहाणू पॅसेंजरमध्ये दोन प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी झाली. या मारामारीत एका प्रवाशाचा अंगठा तुटल्यामुळे एक युवक जखमी झाला आहे. लोकलमध्ये हाणामारीचे प्रकार वाढले असून,या प्रकारांमुळे इतर प्रवाशांमध्ये दहशत पसरली आहे.
बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. पश्चिम रेल्वेवरील विरार स्टेशनवर विरार-डहाणू पॅसेंजर उभी होती. त्यावेळी आपापसातील वादातून भाजी विक्रेत्यांच्या दोन गटांमध्ये मारामारी झाली. मारामारीत चावून एकाचा अंगठा तोडण्यात आला. मारामारी करणारे युवक केळवेमध्ये राहणारे आहेत. इतकी मोठी घटना होऊनही रेल्वेच्या पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.
विरार-डहाणू लोकलमध्ये बसण्याच्या जागेवरुन किंवा दरवाजात उभं राहणं, बोरीवलीपूर्वी प्रवाशांना उतरु न देणं यासारख्या कारणांवरुन होणारे वाद नवीन नाहीत. मात्र मारामारीसारख्या प्रकारांकडे पोलिसांनी लक्ष देण्याची गरज असल्याचं प्रवाशांनी सांगितलं आहे.