दिल्ली : राज्यात सत्ता स्थापनेचचा पेच कायम आहे. भाजपा-शिवसेनेचं नवं सरकार येणार की नवीन आघाडीचा मुख्यमंत्री बसणार हा प्रश्न गुलदस्त्यात आहे. शिवसेनेकडून स्वबळावर सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या दोघांमध्ये दिल्लीत संध्याकाळी भेट होत आहे. या भेटीकडे भाजपचे लक्ष लागले आहे.
काँग्रेसमधून एक गट शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी अनुकूल असून, जर भाजपा-शिवसेनेचं जमलं नाही. तर सरकार स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा द्यायचा का? यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रसेच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यामध्ये आज सोमवारी चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणे हीच सध्याची प्राथमिकता असल्याचं ट्विट निकाल लागल्यानंतर केलं होतं. त्याचबरोबर हुसेन दलवाई यांनीही शिवसेनेला पाठिंबा द्यावा, यासंदर्भात सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं होतं. मात्र, सुशिलकुमार शिंदे आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूमप यांनी विरोध दर्शविला आहे.
दुसरीकडं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनीही शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत विधान केलं होतं. पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी शिवसेनेकडं १७५ आमदारांचं संख्याबळ असल्याचा दावा केला होता. पाठिंबा देणाऱ्याची पत्र असून, राज्यपालांना ती दाखवणार असल्याचंही म्हणाले होते. तसेच शरद पवार यांचीही राऊत यांनी निकालानंतर भेट घेतली होती. त्यामुळे राज्यात नवं समीकरण आकाराला येत असल्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे शरद पवारांचा दिल्ली दौरा आणि सोनिया गांधींशी आज होणा-या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.