मुंबई : भाजप मोठा पक्ष ठरल्यानंतर स्वतःहून सत्तास्थापनेचा दावा करणं ही या देशाच्या राजकारणाची परंपरा आहे. मात्र,भाजपने विलंब केला. राज्यपालांनी निमंत्रण दिल्यानंतर तरी सत्तास्थापन करुन बहुमत सिद्ध करावं. राज्यपालांनी दिलेल्या संधीचा भाजपने लाभ घ्यावा. असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला.
राऊत यांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी शुभेच्छा दिल्या. राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिल्याचं राऊत यांनी स्वागत केलं. भाजपने सत्तास्थापनेसाठी थांबण्याची गरज नव्हती. पुढच्या २४ तासात त्यांनी सत्तास्थापन करायला हवी. भाजपचा भ्रमाचा भोपळा फुटला असल्याचा घणाघातही राऊत यांनी केला.
कुणाचेही आमदार फुटणार नाही. सत्तेच्या जोरावर खरेदी विक्री करता येत नाही असा टोला राऊत यांनी भाजपला लगावला. शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, योग्य वेळी योग्य निर्णय घेणारा उद्धव ठाकरे यांच्याइतका चाणाक्ष नेता राज्यात नाही. असंही बोलण्यास राऊत यावेळी विसरले नाहीत.