नागपूर – गेल्या ३ वर्षात राज्य सरकारने जनतेला फसविले असून भाजप आणि उद्धव ठाकरे हेच सरकारचे खरे लाभार्थी असल्याची अशी खोचक टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे. तसेच गेल्या ३ वर्षात राज्यात १० हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या तर ६७ हजार बालकांचा मृत्यू झाल्याचा आरोप विखे यांनी केला आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी भूमिका मांडण्यासाठी आयोजित केलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सध्याचे युती सरकार ओखी चक्रीवादळाप्रमाणे गुजरातच्या माध्यमातून राज्यावर आल्याचे विखे म्हणाले. मंत्र्यांच्या आश्वासनांवर जनतेला विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे मंत्र्यांनी मदतीचे आश्वासन दिल्यानंतरही हिंगोली येथील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे विखे यांनी सांगितले.शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारकडून शेतकऱ्यांना तारीख पे तारीख मिळत आहे. सरकारने रविवारी बँका सुरु ठेवण्याचा निर्णय हा अधिवेशनाच्या तोंडावर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी घेतल्याचा आरोप विखे यांनी केला आहे.
भाजप आणि शिवसेना यांच्या संबंधावर बोलताना विखे पाटील यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव म्हणतात, गरज पडल्यास सरकार मधून बाहेर पडणार, गरज नेमकी कुणाची शिवसेनेची की जनतेची हे आधी त्यांनी स्पष्ट करावे असा सवाल विखे यांनी शिवसेनेला केला आहे.