शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दसरा मेळाव्यात बोलताना १० रुपयात जेवण देण्याची घोषणा केली होती. आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला. “पाच वर्ष झोपा काढल्या का? आज निवडणुकीच्या तोंडावर १० रुपये थाळी देण्याचे सुचत आहे का? यांना खरंच करायचे असते तर त्यांनी पाच वर्षात केले असते.”, असा सवाल पुणे येथे पत्रकार परिषदेत केला.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, उध्दव ठाकरेंनी युती कशी टिकेल ते आधी बघावं. “मी कसा आहे ते लोकांना माहित आहे. माझे अश्रू मगरीचे आहेत की कशाचे हे तापासायचे काम उध्दव ठाकरे कधीपासून करायला लागले? सरकारने पाच वर्षात काय केले ते सांगावे. माझे अश्रू काय आहेत, हे तपासण्याचे काम उद्धव ठाकरेंनी करु नये, त्यापेक्षा युतीकशी टीकेल हे तपासावे. मी काही रडणारा किंवा पळून जाणारा माणूस नाही. मला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही म्हणून तसे घडले, असे अजित पवार म्हणाले.