महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास हद्दपार करण्याचे पाप भाजप-शिवसेनेच्या सरकारने केले आहे. हे निर्लज्ज सरकार हद्दपार करण्याची ‘हीच ती वेळ’ आहे. राज्यातील तमाम शिवप्रेमी आता ‘घालवुया हे सरकार’ हे एकच उद्दिष्ट समोर ठेवून काम करतील, हे निश्चित असल्याची घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.
शिक्षण मंडळाच्या या निर्णयासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची, या देशाची अस्मिता आहे. या अस्मितेचा इतिहास राज्याच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या चौथीच्या पुस्तकातून पुसून टाकण्यात आला आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजप-शिवसेनेने नेहमी शिवाजी महाराजांच्या नावावर मते मागितली. त्यांच्याच सरकारच्या काळात चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास पुसला जातो, हे निंदनीय आहे. या सरकारचा करावा तेवढा निषेध कमीच आहे.
या सरकारने अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकात फसवणूक केली. महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी केली. स्मारकाच्या कामात भ्रष्टाचार केला. शेतकरी कर्जमाफी योजनेला शिवाजी महाराजांचे नाव देऊन महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्यांची फसवणूक केली. महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास सांगणारे गड-किल्ले विकायला काढले आणि आता महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास हद्दपार करण्याचे पापही यांनी केले आहे, या शब्दांत अशोक चव्हाण यांनी आपला संताप व्यक्त केल.