राज्यात लोकसहभागातून ३३ कोटी वृक्षलागवड सुरु आहे. याअंतर्गत सागरतटीय जिल्ह्यांमध्ये मुंबईच्या कांदळवन कक्षामार्फत ४१ लाख कांदळवन रोपांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
मुनगंटीवार म्हणाले, बृहन्मुंबई परिसरात कांदळवन कक्ष ९ लाख रोपे लावणार आहे. याशिवाय ३ लाख रोपे ठाण्यात, १३ लाख रोपे डहाणूत, रायगड जिल्ह्यात १५ लाख, रत्नागिरी जिल्ह्यात १ लाख रोपे लावली जाणार आहेत. आतापर्यंत ३.३३ लाख रोपांची लागवड झाली असून उर्वरित कांदळवन रोपे ऑगस्टनंतर लावली जातील.
कांदळवन क्षेत्र हे समुद्र आणि खाडी किनाऱ्यावरील जैवविविधतेचे भांडार समजले जाते. मत्स्य बीज तयार होण्याचा उगम व स्रोत आहे. त्याचबरोबर त्सुनामी आणि चक्रीवादळापासून समुद्र आणि खाडी किनाऱ्यावरील लोकांचे संरक्षण करण्यामध्ये कांदळवन क्षेत्र हे महत्वाची भुमिका बजावते. कांदळवन क्षेत्रात सागरी जीवांचे चिरकाल संवर्धन होते हे लक्षात घेऊन कांदळवन कक्षामार्फत कांदळवन विकासासाठी प्रयत्न केले जात आहेत.