नागपूर: नरेंद्र मोदींनी देशाला उद्ध्वस्त केले आहे. पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी सत्ताधारी सरकारवर शरसंधान साधले आहे. कर्जमाफीच्या नावाखाली सरकारने फसवले आहे. त्यामुळे कर्जमाफी न दिल्यास सरकारची देयके थांबवा, असेही शरद पवार यांनी सांगितले.
शरद पवार यांच्यासह गुलाम नबी आझाद यांनीही सरकारच्या धोरणांवर टीका केली. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधत आक्रमक झाले आहेत. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारला जाब विचारण्यासाठी विरोधी पक्षांचा संयुक्त जनआक्रोश आणि हल्लाबोल मोर्चा काढला. तत्पूर्वी सुप्रिया सुळे यांच्यासह विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी दीक्षाभूमी येथे दर्शन घेतले.
दरम्यान शरद पवारांच्या पायाच्या अंगठ्याचे ऑपरेशन झाले आहे. त्यांना प्रकृतीचा किरकोळ त्रासही आहे. असे असताना ही ते हल्लाबोल मोर्चात सहगागी झाले आहे.
दुसरीकडे, विधान भवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी सरकारचा निषेध केला. शेतकऱ्यांना न्याय देता येत नसेल तर सत्तेतून खाली या, अशी विरोधकांनी घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर विरोधक वेलमध्ये येऊन सरकार विरोधात घोषणाबाजी केली. विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे.
सत्ताधारी भाजप-शिवसेना युती सरकारने शेतकरी आणि सामान्यांच्या विषयांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत काँग्रेस-राष्ट्रवादीने हल्लाबोल मोर्चाचे आयोजन केले आहे.
पवारांनी तब्बल ३० वर्षांनी सरकाविरोधात आंदोलन सुरु केले आहे. याआधी १९८५ मध्ये त्यांनी तत्कालीन राज्य सरकारविरोधात सायकल मोर्चा काढला होता. जळगावातून सुरु झालेला हा सायकल मोर्चा नागपुरात संपला होता.