नागपूर : दिवंगत गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी कामगार कल्याणकारी महामंडळ विषयांवरून आज विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. सरकारने २०१४ च्या डिसेंबर महिन्यात ‘दिवंगत गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी कामगार कल्याणकारी महामंडळाची घोषणा केली. पण आज ३ वर्षे उलटूनही या महामंडळाचे साधे कार्यालय का सुरू झाले नाही, असा जाब धनंजय मुंडेंनी सरकारला विचारला.
गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने कल्याणकारी महामंडळ सुरू करणं, हे तमाम ऊसतोड कामगारांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न बनलाय. भाजप सरकार हे केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घोषणा करते मात्र प्रत्यक्षात काहीही करत नाही, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली. परळी इथे महामंडळचे कार्यालय उभारण्याची घोषणा फडणवीस सरकारने केली होती. पण अद्याप त्याबाबत काहीच कार्यवाही झालेली नाही. एवढंच नाहीतर कार्यालय नेमकं कुठे उभारणार हे देखील सरकार अजून ठरवू शकलेलं नाही, त्यामुळे सरकार खरंच लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने ऊसतोडणी महामंडळ स्थापनार आहे का ? असा सवाल मुंडे यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. त्यावर एक महिन्याच्या आत हे कार्यालय उभारू आणि त्याचं कामकाजही सुरू केले जाईल, असे आश्वासन कामगार मंत्री संभाजी निलंगेकर यांनी दिले.