मुंबई : २०१९ विश्वचषकाआधीच भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक खास बातमी आहे. २०२१ साली होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०२३ सालच्या विश्वचषकाचं यजमानपद भारताकडे सोपवण्यात आलं आहे.
२०१९ सालचा विश्वचषक इंग्लंड आणि वेल्समध्ये खेळवण्यात येणार आहे. यानंतर २०२३ साली वनडे विश्वचषक भारतात होणार आहे. याआधी १९८७, १९९६ आणि २०११ मध्ये भारतात वनडे विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं होतं. २०११ साली खेळविण्यात आलेला विश्वचषक भारतानं पटकावला होता.
२०११ चा विश्वचषक हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा शेवटचा विश्वचषक होता. हा विश्वचषक पटकावून टीम इंडियानं सचिनला खास भेट दिली होती. दरम्यान, २०१५ साली ऑस्ट्रेलिया- न्यूझीलंडमध्ये झालेल्या विश्वचषकात भारताचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं होतं. २०२३ च्या विश्वचषकाशिवाय २०२१ सालच्या प्रस्तावित चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजनही भारतातच करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठी पर्वणी असणार आहे.