नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बातच्या ४३ व्या भागातून भारतीयांना संबोधित केले. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी मोदी मन की बात करतात. मन की बातच्या सुरुवातीला मोदींनी कॉमनवेल्थ गेममध्ये यश मिळवलेल्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. जलसंरक्षण ही सर्वांचीच जबाबदारी असली पाहिजे, असंही मोदी म्हणाले आहेत.
भारत सरकारचे स्पोर्ट्स, एचआरडी आणि पाणीपुरवठा या तीन मंत्रालयांनी मिळून स्वच्छ भारत समर इंटर्नशिप २०१८ चं आयोजन केलं आहे. त्यामुळे या इंटर्नशिपमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे. बरीचशी नावाजलेली लोक #FitIndiaच्या माध्यमातून तरुणांना प्रोत्साहित करत असतात ते पाहून खूप बरं वाटतं. अभिनेता अक्षय कुमारनंही एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये तो wooden beadsसह व्यायाम करताना पाहायला मिळतोय. हा व्यायाम पाठ आणि पोटासाठी फायदेशीर आहे, असंही मोदी म्हणालेत.
कॉमनवेल्थ गेममध्ये महिला खेळाडूंनी चांगलं प्रदर्शन केलं आहे. तसेच टेबल टेनिसमधली गोल्ड मेडलिस्ट मनिका बत्रानंही मोदींबरोबर मन की बातमधून संवाद साधला आहे. टेबल टेनिस दिवसेंदिवस प्रसिद्ध होत चाललं आहे. तरुणांनी कधीही हार मानू नये, असंही मनिका बत्रा म्हणाली आहे.