नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात उद्रेक सुरु आहे. दररोज आंदोलने सुरु आहेत. अनेक ठिकाणी जमाव बंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर देशात भाजपाची सत्ता नव्हे तर अघोषित आणीबाणी लागू आहे, अशा शब्दांत काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी गुरुवारी केंद्र सरकारवर टीका केली.
अभिषेक मनु सिंघवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, दिल्लीतील स्थिती ही अघोषित आणीबाणीपेक्षा वेगळी नाही. कारण, दिल्लीतील विविध भागात सध्या संचार बंदी लागू करण्यात आली आहे. १८ मेट्रो स्टेशन्स बंद करण्यात आली आहेत. इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे देशात भाजपाचे सरकार नव्हे तर अघोषित आणीबाणी लागू आहे. अशीच परिस्थिती कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि आसामामध्ये आहे.
दिल्लीत गुरुवारी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या डी. राजा, सिताराम येचुरी, अजय माकन, संदीप दीक्षित, वृंदा करात, निलोप्तल बसू, योगेंद्र यादव, उमर खालीद या विविध पक्षीय राजकीय नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कलम १४४ अंतर्गत ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे भाजपाची सत्ता म्हणजे नरभक्षक सत्ता असल्याची कडवी टीकाही सिंघवी यांनी यावेळी केली.