गुवाहाटी : कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. करोनाची लक्षणं असल्याने केरळमधील हॉटेलमध्ये क्वारंटाइन असलेल्या तीन रुग्णांनी धूम ठोकली आहे. त्यामध्ये एक आसामचा तर दुसरा ओडिशाचा तिसरा पश्चिम बंगालचा रुग्ण आहे.
संशयित रुग्ण पळाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. मुंबईमध्ये आज ६ क्वारंटाइन रुग्णांना बोरिवलीत ट्रेनमधून हाकलून लावण्यात आले. केरमधून पळालेल्या रुग्णांबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक जण आसामच्या मोरीगाव जिल्ह्यातील आहे. त्याचा मोबाइल ट्रेस केला आहे. तो आसामला येणाऱ्या ट्रेनमध्ये असल्याची माहिती आमच्या हाती आली आहे, असं मोरीगावचे पोलीस अधीक्षक स्वप्ननील देका यांनी सांगितलं.
पोलिसांनी त्याचा मोबाइल शेवटचा ट्रेस केला त्यावेळी तो पश्चिम बंगालमध्ये कुठेतरी होता. यामुळे रेल्वे मार्गावर असलेल्या आसाममधील सर्व रेल्वे स्टेशनना यासंदर्भात अलर्ट देण्यात आला आहे. संबंधित प्रवाशावर नजर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याची माहिती देण्यात आली आहे. सरकारच्या रेल्वे स्टेशनवरील पोलिसांनाही अलर्ट करण्यात आलं आहे. लवकरच त्याला ताब्यात घेतलं जाईल, असं देका यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.