उत्तरप्रदेश: उत्तर प्रदेश सरकारने आता राज्यामधील गाईंची संख्या मोजण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे यासाठी सरकारने ७ कोटी ८६ लाखांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. गायींबरोबर राज्यामधील म्हशी, डुकरे, बाकऱ्या आणि मेंढ्यांचीही मोजणी केली जाणार आहे.
एका सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार २०१२मध्ये राज्यातील गायींच्या संख्येची मोजणी झाली होती. त्यावेळी उत्तर प्रदेशमध्ये २०५ लाख ६६ गायी होत्या. ३०६ लाख ३५ हजार म्हशी, १५५ लाख ८६ हजार शेळ्या-मेंढ्या आणि १३ लाख ३४ हजार डुकरे असल्याची माहिती सराकरकडे आहे. मात्र त्यानंतर राज्यातील पाळीव प्राण्यांची मोजणी झालेली नाही. म्हणूनच आता पाच वर्षांनंतर ही मोजणी करण्यात येणार आहे.
या मोजणीसाठी राज्याची एकूण चार भागांमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. या सर्व विभागांमध्ये पशू मेळावे भरवण्यात येतील ज्यामध्ये प्राण्यांसाठी मोफत वैद्यकीय उपचार करण्यात येतीलच मात्र त्यांचा विमाही उतरवण्याची सोय उपलब्ध असेल. या विम्यासाठी पैसे मात्र जनावरांच्या मलाकांनाच भरावे लागतील अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री आणि राज्य सरकारचे प्रवक्ते सिद्धार्थनाथ सिंग यांनी दिली.
याच बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार राज्यातील दिव्यांगाना देण्यात येणाऱ्या पेन्शनच्या रक्कमेमध्ये १०० टक्के वाढ करण्यात आली आहे. आता उत्तर प्रदेशमधील दिव्यांगाना दर महिना ३०० ऐवजी ६०० रुपये मिळणार आहेत.
उत्तर प्रदेश सरकार यंदा लोकमान्य टिळकांची १०१वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करणार असल्याचे समजते. त्यासाठी ३० डिसेंबर रोजी मंत्रीमंडळाची विशेष बैठक आयोजित करण्यात आली असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीसाठी पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.