महत्वाचे…
- देशात प्रचंड महागाई वाढली मोदी त्याकडे दुर्लक्ष करून सतत पेट्रोल, डिझेल,घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढवत आहेत
- भाषण दिल्यानं पोट भरत नाही. त्यासाठी तांदूळ आणि डाळही हवी असते,’ असं सांगतानाच ‘मोदी जिथे जातात तिथे चुकीचं बोलतात.
- चार वर्षापूर्वी दिलेल्या आश्वासनांपैकी कोणती आश्वासने पूर्ण झालीत?
विजापूर: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असतानाच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी कर्नाटकाच्या रणधुमाळीत उडी घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती हल्ला केला. ‘भाषणाची कला चांगली अवगत असल्याचा मोदींना गर्व आहे. सिनेमातील एखाद्या अभिनेत्याप्रमाणे ते भाषण देतात. तुमच्या भाषणाने देशाचं पोट भरत असेल तर खुशाल भाषणं द्या. आणखी भाषणं द्या. पण लक्षात ठेवा केवळ भाषण दिल्यानं पोट भरत नाही,’ असा खोचक टोला लगावतानाच मोदींना काँग्रेसमुक्त भारताच्या भुतानं पछाडलं आहे, अशी घणाघाती टीका सोनिया गांधी यांनी केली.
तब्बल दोन वर्षानंतर सोनिया गांधी यांनी निवडणूक प्रचारसभेत भाग घेतला. विजापूर येथे एका प्रचार सभेला संबोधित करताना सोनिया गांधी यांनी मोदींच्या भाषणबाजीचा चांगलाच समाचार घेतला. ‘आज देशात प्रचंड महागाई वाढली आहे. त्याकडे दुर्लक्ष करून मोदी सतत पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करत आहेत. एकीकडे महागाई वाढत असताना दुसरीकडे मोदी केवळ भाषण देत आहेत. भाषण दिल्यानं पोट भरत नाही. त्यासाठी तांदूळ आणि डाळही हवी असते,’ असं सांगतानाच ‘मोदी जिथे जातात तिथे चुकीचं बोलतात. इतिहासाचा अपमान करतात,’ अशी टीका सोनिया गांधी यांनी केली. ‘देशातील महत्त्वाच्या आणि खऱ्या मुद्दयांवर मौन धारण करणारा पंतप्रधान कधी पाहिलाय काय?,’ असा सवाल सोनिया गांधी यांनी जनतेला विचारला. चार वर्षापूर्वी दिलेल्या आश्वासनांपैकी कोणती आश्वासने पूर्ण झालीत? देशातील शेतकऱ्यांसाठी मोदींनी काय केले? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. देशातील गरिबांसाठी रोजगार हमी योजना आम्ही सुरू केली. तेव्हा या योजनेला मोदी आणि भाजपने विरोध केला होता, असंही त्यांनी सांगितलं.