मुंबई: कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्यासाठी प्रजासत्ताकदिनी (26 जानेवारी) शेतकऱ्यांनी दिल्लीत आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. या हिंसाचारानंतर देशात खळबळ ऊडाली. मात्र, दिल्लीमध्ये Delhi सरकारला हवे होते तेच घडवून आणण्यात आल्याचा आरोप शिवसेनेने आपले मुखपत्र सामनाच्या माध्यमातून केला. “दिल्लीमध्ये जी दंडुकेशाही झाली तिला फक्त आंदोलक शेकऱ्यांना जबाबदार धरून जालणार नाही. तर याद्वारे सरकारला जे हवे होते तेच घडवून आणण्यात आले आहे.
या हिंसाचारात शेतकऱ्यांचे बळी गेले आणि पोलीस, जवानांचे रक्त सांडले. कायदा हाती घेणाऱ्यांची गय कोणत्याच सरकारने करू नये, असं सामना अग्रलेखाद्वारे शिवसेनेने म्हटले आहे. तसेच लाल किल्ल्यावर घुसून ज्या झुंडीने हडकंप माजवला, त्या झुंडीचे नेतृत्व कुणीएक दीप सिद्धू करीत होता. हा सिद्धू पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या आतल्या गोटातला माणूस असल्याचे समोर आले आहे, असा आरोप शिवसेनेने सामनामध्ये केलाय.
दिल्लीमध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या मागे भाजपचा हात
दिल्लीमध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या मागे भाजपचा हात आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. याविषयी शिवसेनेने सामनामध्ये भाष्य केले आहे. “प्रजासत्ताक दिनी देशाच्या राजधानीत जे घडविण्यात आले, त्याचे समर्थन कोणीच करणार नाही. सिंघू बॉर्डरवर साठ दिवसांपासून हजारो शेतकरी आंदोलन करीत आहेत. 26 जानेवारीस ‘ट्रक्टर परेड’ करू, सर्व काही शांततेत होईल असे किसान नेते सांगत होते. पण पोलिसांनी उभारलेले सर्व सुरक्षा कठडे तोडून आंदोलकांचे ट्रक्टर्स दिल्लीच्या हद्दीत घुसले आणि थेट लाल किल्ल्यापर्यंत पोहोचले.
सकाळी दिल्लीच्या राजपथावर प्रजासत्ताक दिनाची ‘परेड’ झाली व दुपारी शेतकऱ्यांच्या ‘परेड’ने संपूर्ण देश हादरून गेला. त्यानंतरआंदोलक शेतकऱ्यांवर भारतीय जनता पक्षाचे लोक तुटून पडले आहेत. लाल किल्ल्यावर घुसून ज्या झुंडीने हडकंप माजवला, त्या झुंडीचे नेतृत्व कुणीएक दीप सिद्धू करीत होता.
हा सिद्धू पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या आतल्या गोटातला माणूस असल्याचे समोर आले आहे,” असे समाना अग्रलेखात म्हटले आहे. तसेच, भाजपचे पंजाबमधील खासदार सनी देओल यांच्याशी सिद्धूचे घनिष्ठ संबंध आहेत. हे महाशय गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या गर्दीत घुसून बंडाची, चिथावणीची भाषा करीत होते, असे राजेश टिकैत वगैरे शेतकरी नेत्यांचे म्हणणं असल्याचंही सामनाने म्हटलंय.
तिरंग्याला कोणीही हात लावलेला नाही
लाला किल्ल्यावर हिसांचार उसळल्यानंतर देशाच्या तरंग्याचा अपमान झाल्याचा दावा अनेकांकडून केला जातोय. मात्र, तिरंग्याला कोणीही हात लावला नसल्याचं शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय. ‘तिरंग्याचा अपमान आंदोलक शेतकऱ्यांनी केल्याची बोंब भाजप पुरस्कृत मीडियाने ठोकली आहे. लाल किल्ल्यावर गोंधळ घालणाऱ्यांचे नेतृत्व जो कुणी सिद्धू करीत होता, त्याचा संबंध भाजपशी आहे. तिरंग्यास कोणीच हात लावला नाही.
एक पिवळ्या रंगाचा धार्मिक झेंडा लाल किल्ल्याच्या दुसऱ्या घुमटावर फडकवण्यात आला हे सत्य कुणीच दाखवायला तयार नाही. पोलिसांवर ज्यांनी हल्ले केले त्यांना जेरबंद करून खटले चालवायला हवेत. कायदा हाती घेणाऱ्यांची गय कोणत्याच सरकारने करू नये, अशी भूमिका शिवसेनेने मांडली आहे. तसेच हे तीन कृषी कायदे म्हणजे देशाचे वर्तमान आणि भविष्य नाही. कुणाचे तरी हित त्यात गुंतल्याचा दावाही शिवसेनेने सामना अग्रलेखात केलाय.