बंगळुरु- अयोध्येतल्या वादग्रस्त जागेवर राम मंदिराशिवाय दुसरी कोणतीच वास्तू उभी राहणार नाही, तिथे फक्त राम मंदिरच उभे राहील, असे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.
कर्नाटकातील उडुपी येथे सुरू असलेल्या धर्मसंसदेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ‘अयोध्येत राम मंदिरच उभे राहील आणि तिथे असलेल्या शिळांचा वापर करूनच होईल. लवकरच राम मंदिरावर एक भगवा ध्वज फडकताना दिसेल. तो दिवस फार लांब नाही,’ असं भागवत म्हणाले.
येत्या ५ डिसेंबरपासून अयोध्या प्रकरणावर सु्प्रीम कोर्टात सुनावणी सुरू होणार आहे. या मुद्द्यावर तोडगा कोर्टाबाहेर तोडगा काढण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. उत्तर प्रदेशातील शिया वक्फ बोर्डाने त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला असून अयोध्येत राम मंदिर व लखनऊमध्ये मशिद उभारण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर भागवत यांचे हे वक्तव्य महत्त्वाचं मानले जात आहे.