नवी दिल्ली: नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी मोदी सरकारला आंदोलक शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्याचं आवाहन केलं आहे. लोकसभेत बोलताना आक्रमक झालेल्या फारुख अब्दुल्ला यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना दुसरीकडे जम्मू काश्मीरमध्ये ४जी सेवा पुन्हा एकदा सुरु केल्याबद्दल आभार मानले आहेत. तसंच करोना लसची निर्मिती करणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञ आणि सीरम इन्स्टिट्यूटचं अभिनंदन केलं आहे.
शेतकऱ्यांशी चर्चा करुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत असं स्पष्ट मत फारुख अब्दुल्ला यांनी व्यक्त केलं आहे. “आपण शेतकरी कायदे तयार केले आहेत. शेतकऱ्यांची कायदे रद्द करावेत अशी इच्छा आहे. त्यांच्याशी चर्चा केल्याने काय नुकसान होणार आहे?,” अशी विचारणा फारुख अब्दुल्ला यांनी केली. “तोडगा काढा, आपण येथे तोडगा काढण्यासाठी आलो आहोत, अडथळे निर्माण कऱण्यासाठी नाही,” असं आवाहन यावेळी त्यांनी केंद्राला केलं.
It's not a religious scripture that changes can't be made. If they (farmers) want it to be repealed, why can't you talk to them? I request that let's not stand on prestige. It's our nation. We belong to this nation, let's respect everybody in the nation: Farooq Abdullah, NC in LS pic.twitter.com/k7EM9GMJHl
— ANI (@ANI) February 9, 2021
“डॉक्टर कधीही रक्ताच्या बाटलीकडे पाहून हे हिंदूचं आहे की मुस्लीम व्यक्तीचं असं विचारत नाही. देवाने सर्वांना समान बनवलं आहे. तुम्ही मंदिरात जाता आणि मी मशिदीत,” असं फारुख अब्दुल्ला म्हणाले आहेत. यावेळी फारुख अब्दुल्ला प्रभू श्रीराम संपूर्ण जगाचे असल्याचा उल्लेख केला. “राम संपूर्ण जगाचे आहेत. राम आम्हा सर्वांचे आहेत. कुराणदेखील फक्त आमचं नाही,” असं ते म्हणाले.
शेतकरी कायदे म्हणजे धार्मिक ग्रंथ नाहीत…
शेतकरी कायद्यांची तुलना धार्मिक ग्रंथाशी करताना फारुख अब्दुल्ला म्हणाले की, “हे कायदे म्हणजे काही धार्मिक ग्रंथ नाहीत, ज्यामध्ये बदल करु शकत नाही. जर कायदे रद्द करण्याची मागणी आहे तर त्यांच्याशी चर्चा का करत नाही? कृपया हा अभिमानाचा विषय केला जाऊ नये. देशात प्रत्येकाने एकमेकांचा आदर केला पाहिजे”.