नवी दिल्ली : विमानांप्रमाणे रेल्वेही ‘डायनामिक प्राईझिंग’ सुरू करण्याच्या विचारात असून त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात रेल्वे तिकिटासाठी जादा पैसे मोजावे लागतील. ‘ऑफ सिझन’मध्ये मात्र थोडीफार सूट यामुळे मिळू शकते.
अधिकार्यांसमवेत गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ‘मागणीवर आधारित भाडे’प्रणाली लागू करण्याची गरज व्यक्त केली होती. त्यानंतर रेल्वेच्या तिन्ही प्रमुख विभागांनी यासंदर्भात आराखडा तयार केला असून 31 डिसेंबर रोजी याला हिरवा कंदील दाखवला जाऊ शकतो. सणासुदीच्या काळात तिकिटावर 10 ते 20 टक्के प्रीमिअर शुल्क आकारण्याचा प्रस्ताव आहे. सलग सुट्ट्या, दिवाळी, दूर्गापूजा, छठ आणि ख्रिसमस यादरम्यान हे अतिरिक्त शुल्क लागू होऊ शकते. अन्य गाड्यांच्या तुलनेत वेगवान धावणार्या गाड्यांच्या तिकीटदरात यामुळे वाढ होईल. इतकेच नव्हे तर वेगवेगळ्या बर्थसाठी वेगवेगळे भाडे आकारण्याचाही प्रस्ताव आहे.
विमान कंपन्या आणि हॉटेल्सप्रमाणेच मंदीच्या काळात तिकीट दरात सवलत देण्याचा विचार रेल्वेकडून सुरु आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी गेल्या आठवड्यात दिली. विमान किंवा हॉटेलमध्ये शेवटच्या क्षणी ग्राहकाला सवलत दिली जाते. तुलनेने कमी गर्दी असणार्या रेल्वे मार्गावर अशा सवलती दिल्या पाहिजेत, असे ते म्हणाले होते. त्याचा नेमका उलट प्रत्यय सणासुदीच्या काळात तिकीट महागाईने येईल हे मात्र तेव्हा कुणाच्याच लक्षात आले नसावे.