नवी दिल्ली: दलितांची दडपशाही करणे भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या DNA मध्येच आहे अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. देशातल्या अनेक शहरांमध्ये दलित बांधवांनी बंदची हाक दिली आहे. त्या बंदला मी सलाम करतो असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. एक ट्विट करून राहुल गांधी यांनी भाजपा आणि संघावर निशाणा साधला आहे.
दलितों को भारतीय समाज के सबसे निचले पायदान पर रखना RSS/BJP के DNA में है। जो इस सोच को चुनौती देता है उसे वे हिंसा से दबाते हैं।
हजारों दलित भाई-बहन आज सड़कों पर उतरकर मोदी सरकार से अपने अधिकारों की रक्षा की माँग कर रहे हैं।
हम उनको सलाम करते हैं।#BharatBandh
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 2, 2018
समाजातील दलित वर्गाला सगळ्यात खालच्या पायरीवर ठेवायचे, त्यांची दडपशाही करायची हा विचार भाजपा आणि संघाच्या डीएनएमध्येच आहे. त्यांच्या या विचाराला जो कोणी आव्हान देण्याचा प्रयत्न करतो त्याविरोधात हिंसाचार भडकवला जातो. हजारो दलित बंधू-भगिनी रस्त्यावर आहेत. आपल्या हक्कांचे रक्षण व्हावे यासाठी आंदोलन करत आहेत त्यांच्या धैर्याला मी सलाम करतो अशा आशयाचे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भातल्या आदेशाबाबत पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी दलित संघटनांनी केली होती. सरकारनेही त्यासाठी सहमती दर्शवली होती.
तिकडे केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मात्र काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेस फक्त विरोधाला विरोध म्हणून आमच्या विरोधात भूमिका घेतो आहे. तसेच दलितांबाबतची वक्तव्ये चुकीच्या पद्धतीने पसरवली जात आहेत असेही प्रसाद यांनी म्हटले आहे. अॅट्रॉसिटी कायद्याबाबत पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या बाजूनेच आहोत आमची भूमिका दलित विरोधी नाही असेही प्रसाद यांनी म्हटले आहे.