महत्वाचे…
१. राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब
२. विरोधकांनी सरकार विरोधात केली घोषणाबाजी
३. नोटाबंदीचा निर्णय नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीला कर्ज देण्यासाठी घेण्यात आला
नवी दिल्ली: नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी पीएनबीला १२ हजार कोटींपेक्षा जास्त रकमेचा चुना लावला. हे दोघेही कर्जबुडवे सध्या भारताबाहेर पळाले आहेत. याच मुद्द्यावरून संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात विरोधकांनी गदारोळ केला. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. हा गदारोळ इतका वाढला की राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.
नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी केलेला हजारो कोटींचा घोटाळा केंद्र सरकारला ठाऊक होता असा आरोप विरोधकांनी याआधीच केला आहे. तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही नोटाबंदीचा निर्णय नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीला कर्ज मिळण्यासाठी घेण्यात आला असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. या प्रकरणी सीबीआय आणि ईडी (अंमलबजावणी संचलनालय) यांची कारवाई सुरु आहे. नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेच्या काही अधिकाऱ्यांना लाच देऊन लेटर ऑफ अंडरटेकिंग्ज मिळवले. त्यानंतर याच माध्यमातून पीएनबीचे हजारो कोटी रुपये लुटले आणि पसार झाला.
या आधी स्टेट बँकेकडून ९ हजार कोटी रुपये घेऊन मद्यसम्राट विजय मल्ल्या भारताबाहेर पळाला. त्याच्या प्रत्यार्पणाची तयारी सुरु असतानाच, नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेला १२ हजार कोटींपेक्षा जास्त चुना लावल्याचे स्पष्ट झाले. या सगळ्या घोटाळ्याचे खापर विरोधकांनी सरकारच्या डोक्यावर फोडले आहे. आम्ही घोटाळेबाजांना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही त्यांच्या मुसक्या आवळणारच असे केंद्र सरकारने म्हटले आहे. अशात विरोधकांनी मात्र या घोटाळ्याला सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला. तसेच याच घोटाळ्याचे पडसाद आज संसदेच्या दोन्ही सभागृहात पाहायला मिळाले.