नवी दिल्ली: निर्भया सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणात दोषी ठरलेला विनय शर्मा याची आणखी एक युक्ती अपयशी ठरली आहे. राष्ट्रपतींद्वारे विनय शर्मा याची दया याचिका फेटाळण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत फाशी टाळण्याची मागणी करणारे विनयची याचिका आज शुक्रवार (१४ फेब्रुवारी) रोजी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे.
विनयने आपण मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे सांगत आपल्याला फाशी देऊ नये अशी मागणी सुप्रीम कोर्टात केली होती. सर्वोच्च न्यायालयाने मात्र विनय हा मानसिकदृष्ट्या ठीक असल्याचे म्हटले आहे. गुरुवारी सुनावणीनंतर कोर्टाने हा निकाल राखून ठेवला होता.
विनय, मुकेश आणि अक्षयचे दयेचे अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळले आहेत. पवन याने मुदत संपूनही क्युरेटिव्ह याचिका वा दयेचा अर्ज केलेला नाही. त्यामुळे १४ दिवसांचे अंतर ठेवून सर्वांविरुध्द नवे डेथ वॉरन्ट लगेच काढावे, असे अर्ज पीडितेचे पालक व दिल्ली प्रशासनाने केले आहेत.
पवन गुप्ता याने अद्याप वकील केला नसल्याने कायदेशीर मार्ग अनुसरण्यासाठी त्याला अवधी मिळावा यासाठी न्या. धर्मेंद्र राणा सोमवारी सुनावणी घेतील. पवनचा वकील उभा राहिल्याखेरीज सुनावणी घेणार नाही, असे नमूद करत न्या. राणा म्हणाले की, डेथ वॉरन्ट खूप संवेदनशील विषय आहे. गुन्हेगाराला सर्व कायदेशीर हक्क उपलब्ध असतात. न्यायालय ते डावलू शकत नाही.