कोलकाता: भाजपाला २०१९ सालची लोकसभा निवडणूक जिंकणे शक्य नाही. त्यामुळे मोदींची लाल किल्ल्यावरून भाषण करण्याची यंदाची शेवटची वेळ असेल, असे भाकीत तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी वर्तविले आहे.
त्रिपुरातील विजयामुळे भाजप सध्या खूप आनंदात आहे. परंतु, त्रिपुरात लोकसभेच्या फक्त दोनच जागा आहेत. त्यामुळे उर्वरित ५४३ जागांवर काय घडणार, हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो, असे ओब्रायन यांनी म्हटले. भाजपने आधी २०१९ सांभाळावे आणि मगच पश्चिम बंगाल जिंकण्याचे स्वप्न पाहावे. भाजपसाठी आमचा हा सल्ला आहे. तुमचे आगामी लक्ष्य जर पश्चिम बंगाल असेल तर आमचेही टार्गेट लाल किल्ला आहे. पंतप्रधान मोदी यांचे लाल किल्ल्यावरील यंदाचे भाषण शेवटचे असेल. १५ ऑगस्ट २०१९ मध्ये ते लाल किल्ल्यावरून भाषण देणार नाहीत, असे सांगतानाच ‘मोदींचा मुकाबला करण्यासाठी आमच्यासोबत या,’ असे आवाहनही त्यांनी विरोधकांना केले.
यावेळी डेरेक ओब्रायन यांनी राजस्थानातील पोटनिवडणुकांच्या निकालाकडे प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्रिपुरातील विजयामुळे भाजप एवढा खूष का झाला आहे? १५ दिवसांपूर्वीच राजस्थान पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. अलवरमध्ये २०१४ मध्ये भाजपने २.८० लाख मतांनी विजय मिळविला होता. मात्र, आता झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला याच मतदारसंघात १.५० लाख मतांनी पराभव स्वीकारावा लागला आहे, असे ओब्रायन यांनी सांगितले.