अगरतळा: त्रिपुरा विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर माणिक सरकार यांनी आपला मुक्काम पक्ष मुख्यालयात हलविला आहे. सरकार यांच्याकडे स्वत:च्या मालकीचे घर नसल्याने ते आपल्या पत्नीसह पक्ष मुख्यालयातील दोन खोल्यांमध्ये राहत आहेत.
पक्ष मुख्यालय मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापासून ५०० मीटरच्या अंतरावर आहे. माणिक सरकार यांनी दशरथ देब स्मृती भवन या पक्ष मुख्यालयाची काल रात्री पाहणी केली. नवीन मुख्यमंत्री पदभार स्वीकार करेपर्यंत सरकार राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून पाहत आहेत. त्यामुळे सरकार यांना अद्यापपर्यंत सरकारी निवासस्थान,
वैयक्तिक मदतनीस, वाय-दर्जाची सुरक्षाव्यवस्था कायम आहे. मात्र, सरकार यांनी सर्वांचा त्याग करून थेट पक्ष मुख्यालयात आपला मुक्काम ठोकला आहे. माणिक सरकार यांच्या खोलीत स्वत: चे साहित्य, पुस्तके आहेत. जगातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी
दुरचित्रवाणी संच नव्याने बसविण्यात आल्याचे पक्ष कार्यकर्त्याने सांगितले. माणिक सरकार संपत्तीच्या दृष्टीने देशातील सर्वात गरीब मुख्यमंत्री ठरले होते. त्यांच्याकडे स्वत:च्या मालकीचे घर देखील नाही. त्यांच्या पत्नी निवृत्त सरकारी कर्मचारी आहेत. तसेच आपल्या मालकीची मूळगावी असलेली संपत्ती त्यांनी पक्षाला दान केल्याचे सीपीआय(एम)च्या संबंधिताने सांगितले.