नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारनं दिवाळी भेट दिली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा ५० लाख कर्मचारी व ६५ लाख निवृत्तीवेतन धारकांना मिळणार आहे. यामुळे कर्मचा-यांनी आनंद व्यक्त केला.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबतची माहिती दिली. नव्या निर्णयामुळं केंद्रीय कर्मचाऱ्यांचा भत्ता १२ टक्क्यांवरून १७ टक्के झाला आहे. वाढीव भत्ता जुलै २०१९ पर्यंत कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार ही वाढ करण्यात आली असून या निर्णयामुळं सरकारच्या तिजोरीवर १६ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.