नवी दिल्ली: नागरिकत्व सुधारित कायद्याच्या विरोधातील आंदोलने प. बंगाल व ईशान्येकडील राज्ये धुमसत असताना देशाची राजधानीतही आंदोलनाला हिंसकवळण लागले. या हिंसाचारावरुन मोदी सरकार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी निशाणा साधला आहे. अमित शाह यांच्याकडे ईशान्येत जाण्याची हिंमत नाही असा टोला सोनिया गांधी यांनी लगावला आहे.
देशभरात सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन आंदोलन पेटले आहे. दररोज आंदोलक हिंसक होत चालले आहेत. अनेक ठिकाणी निदर्शनं सुरु आहेत. ईशान्येकडी राज्यांमध्ये कायद्याला विरोध होताना हिंसाचार झाल्याची काही प्रकरणं समोर आली आहेत. आसाम आणि त्रिपुरामधील अनेक ठिकाणी कर्फ्यू लावण्यात आला आहे. सोबतच मोठ्या प्रमाणात सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत. अमित शाह ईशान्येचा दौरा करणार होते. मात्र राज्यातील बिघडती परिस्थिती पाहता त्यांनी आपला दौरा रद्द केला. अमित शाह रविवारी पोलीस अकॅडमीला भेट देणार होते. मात्र त्यांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने दौरा रद्द केला.
सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे की, “शांतता आणि सुव्यवस्था राखणं तसंच कायद्याचं पालन करत कारभार चालवणे आणि संविधानाची रक्षा करणं सरकारचं काम आहे. मात्र भाजपा सरकार देश आणि देशवासियांवरच हल्ला करत आहे”. मोदी सरकार देशवासियांमध्ये फूट पाडत असल्याचा आरोपही सोनिया गांधी यांनी केला आहे. सरकार देशात द्वेष निर्माण करत असून तरुणांचं भविष्य अंधाराच्या दिशेने ढकलत आहे असंही सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.