दिल्ली: ‘कठुआ’ सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला आहे. हे प्रकरण ताजं असतानाच सुरतमध्ये ११ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीच्या शरीरावर आढळलेल्या गंभीर जखमा पाहता तिचा ८ ते १० दिवस अत्यंतिक शारीरिक छळ करण्यात आला असावा अशीही माहिती समोर आली आहे. या दोन्ही घटनांनंतर देशभरातून संताप व्यक्त होताना दिसत आहे. प्रकरणावर महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर आपला राग व्यक्त केला होता.
तर मी जल्लादाचं कामचही विनासंकोच करेन…
‘आतापर्यंत जल्लादाच्या कामाला प्रतिष्ठा नव्हती. पण छोट्या मुलींवर बलात्कार करून त्यांची हत्या करणाऱ्या नराधमांना फाशी द्यायची असेल तर मी जल्लादाचं कामचही विनासंकोच करेन. माझ्या देशात अशाप्रकारचं हिन कृत्य होताना पाहून माझं रक्त खवळतं. अशावेळी स्वत:ला शांत ठेवणं खूपच कठीण जातं.’ असं ट्विट करत आनंद महिंद्रा यांनी आपला राग व्यक्त केला आहे. संपूर्ण राज्यात या घटनेचे पडसाद उमटत असून राग व्यक्त करण्यासाठी व न्यायाच्या मागणीसाठी नागरीक रस्त्यावर उतरले आहेत. सर्वसामान्य लोकांपासून ते पोलीस प्रशासनापर्यंत सर्वांनीच बलात्कार करणाऱ्या व्यक्तीची माहिती देणाऱ्यासाठी बक्षीसाची घोषणा केली आहे. या मुलीची ओळख पटली नसून येथील स्थानीक तुषार घेलानी यांनी आरोपींबद्दल माहिती देणा-याला ५ लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. तसंच पोलिसांनीही २० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. पोलिसांनी मुलीचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. तसेच १२०० भित्तीचित्रांचे शहरभर वाटप करण्यात आले असून मुलीच्या कुटुंबियांचा शोध घेतला जात आहे.
The job of executioner is not an aspirational job. But for the execution of brutal rapists & murderers of young girls I would volunteer unhesitatingly. I work hard to stay calm, but my blood boils over to see this happen in our country.. https://t.co/1VXD5QfYKA
— anand mahindra (@anandmahindra) April 15, 2018
तर कठुआ प्रकरणातही काल मुंबईसह पुणे, औरंगाबादमध्ये निषेध नोंदवण्यात आला. यावेळी सेलिब्रिटींसह अनेकजण रस्त्यारवर उतरले होते. कठुआ प्रकरणाची दखल संयुक्त राष्ट्रांनीही घेतली. या प्रकरणातल्या नराधमांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी भूमिका आता संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटिनो गेटर्स यांनी मांडली आहे. सर्वत्र सोशल मीडियावर चर्चेला उधाण आला आहे.