नवी दिल्ली : शिवसेना आणि चंद्रबाबू नायडू हे एनडीएमधून बाहेर पडणार अशा वल्गनाच करत होते. मात्र हिंदुस्तानी आवाम मोर्चा चक्क एनडीएतून बाहेर पडून सर्वांनाच धक्का दिला. माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांचा हा पक्ष आहे. लोकसभेच्या निवडणूकीपूर्वी बरेच पक्ष एनडीएतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. यामुळे भाजपासाठी पुढील निवडणूक अडचणीची जाण्याची शक्यता आहे.
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे अध्यक्ष जीतन राम मांझी यांनी एनडीएपासून संबंध तोडले आहेत. मांझी यांनी याआधी तेजस्वी यादव यांची भेट घेतली. तेजस्वी आणि मांझी यांच्यात एका बंद खोलीत चर्चा झाली. जीतन राम मांझी अनेक दिवसांपासून एनडीएवर नाराज होते. जहानाबाद सीटवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत मांझी यांनी उमेदवारी मिळावी म्हणून इच्छा व्यक्त केली होती. पण त्यांना तिकीट न मिळाल्याने त्यांनी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी आरजेडी नेता भोला यादव यांनी जीतन राम मांझी यांनी खुली ऑफर दिली होती. यानंतर भेट झाली आणि मांझी यांनी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.