देशाच्या जीडीपीमध्ये झालेल्या घसरणीवरुन माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकारने घेतलेल्या चुकीच्या निर्णयांचा फटका आज देशाला बसत आहे. नोटबंदी आणि जीएसटी यासारखे निर्णय देशातील आर्थिक मंदीसाठी कारणीभूत ठरत आहेत, अशी टीका मनमोहन सिंग यांनी केली.
मागील तिमाहीत जीडीपी 5 टक्के होता. यातून असं दिसून येत की देश मोठ्या आर्थिक मंदीतून जात आहे. वेगाने विकास करण्याची क्षमता भारताकडे आहे. मात्र मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. उत्पादन क्षेत्रातील वाढ थेट 0.6 टक्क्यांनी घसरल्यामुळे स्थिती चिंताजनक आहे. नोटबंदी आणि जीएसटीमुळे ढासळलेली अर्थव्यवस्था सावरली नसल्याचं यातून स्पष्ट होतं, असं मनमोहन सिंग यांनी म्हटलं.
मोदी सरकारने राजकारण बाजूला सारुन या मंदीच्या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. तज्ज्ञ मंडळींचे सल्ले गांभिर्याने घेणे गरजेचं आहे, असं मनमोहन सिंग यांनी सुचवलं. देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती गंभीर आणि चिंताजनक आहे.
Our economy has not recovered from the man made blunders of demonetisation & a hastily implemented GST… I urge the govt to put aside vendetta politics & reach out to all sane voices to steer our economy out of this crisis: Former PM Dr Manmohan Singh #DrSinghOnEconomicCrisis pic.twitter.com/83cBJWHay9
— Congress (@INCIndia) September 1, 2019
मोदी सरकारच्या चुकीची धोरणं आणि योजनांमुळे देशावर बेरोजगारीचं मोठं संकट ओढावलं आहे. केवळ ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये साडेतीन लाखांहून अधिक नोकऱ्या गेल्या आहेत आणि इतर क्षेत्रातील नोकऱ्याही धोक्यात आहेत, असं मनमोहन सिंग यांनी सांगितलं.