नवी दिल्ली l केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. हे शेतकरी दिल्ली सीमेवर निषेध करत आंदोलन करत आहे. देशातून सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांचा पाठिंबा मिळत आहे. अभिनेता दिलजीत दोसांजने जनतेला आवाहन करत या आंदोलनाला जातीयवादाचा रंग देऊ नका असं म्हटलं आहे.
सध्या सर्वत्र या शेतकरी आंदोलनाची चर्चा सुरु आहे. यामध्येच अनेकांकडून आंदोलनाला जातीयवादाचा रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच दिलजीतने नागरिकांना आंदोलनाकडे आंदोलन म्हणूनच पाहा, त्यात जातीयवादाचा मुद्दा आणण्याचा प्रयत्न करु नका, असं आवाहन केलंय. त्याने ट्विट करत त्याच मत मांडलं आहे.
काही लोक आंदोलनाच्या नावाखाली हिंदू-शीख असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण हा मुद्दा फक्त शेतकऱ्यांचा आहे. यात धर्माचा कोणताच विषय किंवा मुद्दा नाहीये.कोणताही धर्म कधीच वादा करण्यासाठी सांगत नाही, असं ट्विट दिलजीतने केलं आहे. दिलजीतने हे ट्विट केल्यानंतर सोशल मीडियावर ते तुफान व्हायरल झालं.
दरम्यान, दिलजीतने या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला असून तो सातत्याने सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. यापूर्वी त्याने थंडीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना १ कोटी रुपायांची मदत केली असून या पैशातून त्याने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना स्वेटर व चादरी पुरविल्या आहेत.