महत्वाचे…
१. दीपक मिश्रांनी पदाचा गैरवापर केल्याचे काँग्रेसने म्हटले आहे
२. सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश ब्रीजगोपाल लोया यांच्या मृत्यूप्रकरणात सुप्रीम कोर्टाने निकाल दिला होता
३. देशाने गप्प राहुन काहीच कृती न करणे हे योग्य आहे का ?
नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रांविरोधात काँग्रेसने शुक्रवारी महाभियोग ठरावासंदर्भात नोटीस दिली आहे. काँग्रेस नेत्यांनी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांची भेट घेत ही नोटीस दिली. यावर ७१ खासादारांनी स्वाक्षरी केल्याचे काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले.
सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश ब्रीजगोपाल लोया यांच्या मृत्यूप्रकरणात सुप्रीम कोर्टाने गुरुवारी महत्त्वपूर्ण निकाल दिला होता. लोया यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे स्पष्ट करतानाच लोया यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची आवश्यकता नाही, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले होते. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निर्णय दिला होता.
जानेवारीमध्ये माकपने दीपक मिश्रांविरोधात महाभियोग ठराव मांडण्यासंदर्भात विरोधी पक्षांशी चर्चा केली होती. गुरुवारच्या निकालानंतर या हालचालींनी पुन्हा वेग धरला. शुक्रवारी दुपारी संसद भवनात विरोधी पक्षांची बैठक झाली. या बैठकीनंतर काँग्रेस नेत्यांनी राज्यसभेचे सभापती व उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची भेट घेतली. या भेटीत काँग्रेस खासदारांनी महाभियोग ठरावासंदर्भातील नोटीस दिली. दीपक मिश्रांनी पदाचा गैरवापर केल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.
हि वेळ यायला नको होती पण…
सरन्यायाधीशांविरोधात महाभियोग ठराव मांडण्याची वेळच यायला नको होती. पण आम्हाला नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागला. ज्या दिवसांपासून दीपक मिश्रांची सरन्यायाधीशपदी निवड झाली त्या दिवसापासून त्यांनी काही प्रकरणांमध्ये घेतलेल्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होते, असे कपिल सिब्बल यांनी सांगितले. सुप्रीम कोर्टातील काही न्यायाधीशांनीच न्यायपालिकेचे स्वातंत्र्य धोक्यात असल्याची चिंता व्यक्त करत सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले होते. अशा परिस्थितीतही देशाने गप्प राहुन काहीच कृती न करणे हे योग्य आहे का, असा प्रश्न त्यांनी विचारला.