महत्वाचे…
१. एमआयएमकडून उत्तर प्रदेशात तक्रार दाखल
२. श्री श्री रविशंकर यांनी सिरियाप्रकरणी टिप्पणी केली होती
३. श्री श्री यांनी घुमजावही केले होते
लखनऊ: अयोध्या प्रकरणी कोर्टाबाहेर परस्पर संवादातून तोडग्यासाठी प्रयत्न करणारे आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी सिरियाप्रकरणी टिप्पणी केल्याबद्दल एमआयएम पक्षाकडून त्यांच्याविरोधात गुरुवारी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
#Lucknow: AIMIM leader Tauhid Siddiqui files complaint against Sri Sri Ravi Shankar over his Syria comment. pic.twitter.com/VsNqKWhPtk
— ANI UP (@ANINewsUP) March 8, 2018
श्री श्री रविशंकर यांनी म्हटले होते की, भारतात शांतता राहू द्या, आपला देश सिरियासारखा होता कामा नये. जर सिरियासारखी अवस्था आपल्याकडे झाली तर सत्यानाश होईल. त्याचबरोबर एका खासगी वृत्त वाहिनीशी बोलताना श्री श्री म्हणाले होते, अयोध्या प्रकरणावर जर तोडगा निघाला नाही तर देश सीरिया बनेल. अयोध्या मुस्लिमांचे धार्मिक स्थळ नाही, त्यामुळे त्यांना इथल्या धार्मिक स्थळावरील आपला दावा सोडून एक आदर्श निर्माण करावा. या विधानानंतर त्यांच्यावर चारही बाजूने टीका होऊ लागली. दरम्यान, या विधानाविरोधात लखनऊमध्ये एमआयएमचे नेते तौहीद सिद्दीकी यांनी श्री श्री रविशंकर यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनीही श्री श्री रविशंकर यांच्यावर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते, श्री श्री रविशंकर हे लोकांना भडकावण्याचे काम करीत असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली होती. यानंतर श्री श्री यांनी ट्विटरवरुन ओवेसी यांच्यावर पलटवार केला होता. ते म्हणाले होते, सावधानतेला धमकी मानने आणि सौहार्दतेला हल्ला मानने ही विकृत मनाची ओळख आहे.
त्याचबरोबर शिवसेनेनेही आपल्या मुखपत्रातून श्री श्री रविशंकर यांच्यावर टीका केली होती. अयोध्या प्रकरण सुप्रीम कोर्टात असताना श्री श्री यांनी या प्रकरणी विनाकारण लुडबूड करु नये, भारत कधीही सिरिया बनणार नाही असे यात म्हटले होते.