नवी दिल्ली : हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) ची बैठक आज पार पडली. महाराष्ट्रातील सत्तस्थापनेवरून शिवसेनेने भाजपपासून फारकत घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेचे प्रतिनिधी बैठकीत नव्हते. त्यामुळे लोकजनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी शिवसेनेची कमतरता जाणवत असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक पार पडली. बैठकीत संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रलंबित बिलं आणि सरकारची भूमिका यावर चर्चा झाली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे मित्रपक्ष असलेल्या लोकजनशक्ती पक्षाचे युवा नेते चिराग पासवान यांनी शिवसेनेची कमतरता जाणवत असल्याचं मत व्यक्त केलं. भविष्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मजबूत करण्यासाठी एक नवीन समिती स्थापन करुन चर्चा करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
महाराष्ट्रात शिवसेनेसोबत भाजपचा झालेला काडीमोड पाहून लोक जनशक्ती पक्षाने झारखंड विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र एनडीएतून बाहेर न पडल्यामुळे चिराग पासवान बैठकीला हजर होते. बिहारमध्ये भाजप, लोजप आणि जदयू यांचं युतीचं सरकार आहे.