पाटणा – लष्करावर केलेल्या वक्तव्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. भागवातांच्या विधानावरुन सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका होत होती. त्यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र संघाने घुमजाव करत भागवतांच्या विधानाचा वेगळा अर्थ काढण्यात आला असा खुलासा प्रसिध्दीपत्रकाव्दारे केला होता. आता या प्रकरणी न्यायालयात १५ फेब्रुवारीला त्यावर सुनावणी होणार आहे.
मुजफ्फरपूर शहरातील रहिवासी एम राजू नयीआर यांनी मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात हे प्रकरण दाखल केले आहे.नयीआर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे, की सरसंघचालकांनी आपल्या वक्तव्यामुळे केवळ लोकांच्याच भावना दुखावल्या नाहीत तर भारतीय सैन्याचाही अपमान केला आहे. सैन्याला तयारीसाठी ६-७ महिने लागतील मात्र, देशासाठी लढायला ३ दिवसांतच सैन्याची निर्मिती करण्याची क्षमता आरएसएसमध्ये आहे, असे वादग्रस्त वक्तव्य सरसंघचालकांनी रविवारी मुजफ्फरपूरमधील शिबिरात केले होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक लष्करी संघटना नाही, मात्र आपली शिस्त लष्कराप्रमाणेच आहे. देशाला गरज पडल्यास तसेच संविधानाने आणि कायद्याने आम्हाला परवानगी दिली तर आम्ही तात्काळ शत्रूशी लढण्यास तयार आहोत, असे भागवत म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर देशभरातून विरोध झाला.