नवी दिल्ली: काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर अवघ्या दोन ओळीचं ट्विट करून टीका केली आहे. मोदी सरकार देशाची संपत्ती भांडवलदार मित्रांना हँडओव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
राहुल गांधी यांनी ट्विट करून केंद्रीय अर्थसंकल्पावर टीकास्त्र सोडलं आहे. आजच्या अर्थसंकल्पात गरीबांसाठी काहीच देण्यात आलेलं नाही. गरीबांच्या हातात रोख रक्कम येण्याची बात सोडाच, पण मोदी सरकार आपल्या काही भांडवलदार मित्रांना देशाची संपत्ती हँडओव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
गरीबांच्या हातात थेट रोख रक्कम देण्याची राहुल गांधी यांनी अनेकदा मागणी केली आहे. कोरोनाच्या काळातही त्यांनी ही मागणी केली होती. गरीबांच्या हातात पैसा आला तर ते खर्च करतील. त्यामुळे अर्थव्यवस्थेलाही गती मिळेल, असा राहुल यांचा तर्क आहे. मात्र, यंदाच्या बजेटमध्ये केंद्र सरकारने अशा कोणत्याच योजनेची घोषणा केलेली नाही.