महत्वाचे…
१. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यावर टीका करताना ‘हत्येचे आरोपी’ म्हणून उल्लेख केला
२. भाजपा पक्ष जो नेहमी प्रामाणिकपणा आणि सभ्यतेबद्दल बोलत असतो त्यांचा अध्यक्ष हत्येचा आरोपी
३. अमित शाह यांनी विश्वासार्हता गमावली
कर्नाटक: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यावर टीका करताना ‘हत्येचे आरोपी’ म्हणून उल्लेख केला. भाजपा पक्ष नेहमी प्रामाणिकपणा आणि सभ्यतेबद्दल बोलत असतो, मात्र एक अशी व्यक्ती त्यांचा प्रमुख आहे ज्याच्यावर हत्येचा आरोप आहे असं राहुल गांधी बोलले आहेत. अमित शाह यांनी विश्वासार्हता गमावली असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राहुल गांधींनी पत्रकारांशी संवाद साधला.
“अमित शाह हत्येचे आरोपी होते. त्यांनी आपली विश्वासार्हता गमावली आहे. त्यांचा भूतकाळ पाहिला पाहिजे. कोणत्या गोष्टींसाठी ते जबाबदार आहे ते देखील पाहिलं पाहिजे. ते कशाप्रकारे राजकारण करतात ते पहा. याशिवाय ते हत्येचे आरोपी आहेत हे विसरु नका. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. भाजपाचा अध्यक्ष हत्येचा आरोपी आहे. हे सत्य आहे. भाजपा पक्ष जो नेहमी प्रामाणिकपणा आणि सभ्यतेबद्दल बोलत असतो त्यांचा अध्यक्ष हत्येचा आरोपी आहे”, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.
Amit Shah has been accused of murder. Don’t think he has lot of credibility. People in India forget that BJP President is a murder accused. Party that talks about honesty, decency has a person who’s been accused of murder as President:Rahul Gandhi in Bengaluru #KarnatakaElections pic.twitter.com/e7rPnAOkKF
— ANI (@ANI) May 8, 2018
विशेष म्हणजे यावेळी पहिल्यांदाच राहुल गांधी यांनी आपण पंतप्रधानपदासाठी इच्छुक असल्याचं मान्य केलं. २०१९ निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला तर तुम्ही पंतप्रधान होणार का ? असा प्रश्न विचारला असता, यावर ‘हो नक्कीच’ असं उत्तर राहुल गांधींनी दिलं.
भाजपा, आरएसएसकडून प्रत्येक संस्था आपल्या ताब्यात घेण्यासाठी वारंवार प्रयत्न केले जात असून काँग्रेसने त्यांचे प्रयत्न हाणून पाडले आहेत असं राहुल गांधी बोलले. यावेळी बोलताना राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर टीका करत काही प्रश्न विचारले.
कर्नाटकाच मुख्य प्रश्न आहे की, भ्रष्टाचारी आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपदाचं तिकीट का देण्यात आलं आहे. नरेंद्र मोदींना स्वच्छ प्रतिमा असलेला उमेदवार का मिळाला नाही ? याचं उत्तर त्यांनी द्यावं. तसंच रेड्डी ब्रदर्सना तिकीटं का देण्यात आली आहेत. ३५ हजार कोटींचा घोटाळा करत त्यांनी सामान्यांचे पैसे लाटले असताना उमेदवारी कशासाठी हा सवाल राहुल गांधींनी विचारला.
नरेंद्र मोदींनी दरवर्षी २ कोटी रोजगार निर्माण करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण मग ते का झालं नाही याचं स्पष्टीकरण त्यांनी तरुणांना दिलं पाहिजे अशी मागणी राहुल गांधींनी केली. यावेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित करत जर काँग्रेस शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ शकते तर मग मोदी सरकार ते का देऊ शकत नाही ? असा सवाल विचारला.