दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी राजघाटवर लाक्षणिक उपोषण केल्यानंतर केंद्र सरकारवर निशाणा साधला. भाजपाच्या विचारधारेमुळे आज देशात ही परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपाची विचारधारा देशात फुट पाडत असून दलितांना चिरडले जात आहे, असा आरोप केला. भाजपा दलित विरोधी आहे, असा गंभीर आरोप करत आम्ही त्यांना २०१९ मध्ये पराभूत करू, असा इशाराही दिला.
राहुल गांधी यांनी भाजपा सरकार दलित विरोधी असल्याचा आरोप करत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते. उपोषणानंतर राहुल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, भाजपाची विचारधारा आदिवासी आणि अल्पसंख्याकांना चिरडणारी आहे. आम्ही भाजपाच्या विचारधारेविरोधात उभे आहोत आणि आयुष्यभर यासाठी विरोध करू. आम्ही त्यांना २०१९ मध्ये पराभूत करून दाखवू असा विश्वासही व्यक्त केला. दरम्यान, राहुल गांधी उपोषणस्थळी उशिरा आल्यामुळे मोठी चर्चा रंगली होती. त्यातच काँग्रेसचे काही नेते राजघाटवर छोले-भटुरे खाऊन आल्याचे छायाचित्र समाध्य माध्यमांवर व्हायरल झाले. परंतु, यावर राहुल यांनी काहीच भाष्य केले नाही.
भाजपाचे दलित खासदारही पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहीत असल्याचे पत्रकारांनी राहुल यांना निर्दशनास आणून दिल्यानंतर ते म्हणाले, ते (भाजपा खासदार) आम्हाला सांगतात की मोदी हे दलित विरोधी आहेत. त्यांना दलितांचे हित नको असते. संपूर्ण देश जाणतो की पंतप्रधान दलित विरोधी आहेत. आता हे लपून राहिलेले नाही.