दिल्ली: आंध्र प्रदेश या राज्याला विशेष राज्याचा दर्जा मिळावा यासाठी टीडीपीचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. या कार्यकर्त्यांची भेट मंगळवारी राहुल गांधी यांनी घेतली. तसेच त्यांच्या आंदोलनातही राहुल गांधी सहभागी झाले. एवढेच नाही तर २०१९ मध्ये काँग्रेसची सत्ता आली तर आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देऊ असे आश्वासनही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले.
“Our stance is very clear. We are in favour of special category status for Andhra Pradesh.”: Congress President Rahul Gandhi. #INCStandsWithAndhra pic.twitter.com/U5Prylfzju
— Congress (@INCIndia) March 6, 2018
आंध्र प्रदेश या राज्याला विशेष राज्याचा दर्जा मिळावा ही काँग्रेसचीही भूमिका आहे. २०१९ मध्ये जेव्हा आमची सत्ता येईल तेव्हा आम्ही सर्वात आधी या राज्याला विशेष राज्याचा दर्जा देऊ. जर आपण सगळे एकत्र आलो तर आत्ताही पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपल्या मागणीची दखल घ्यावी लागेल. आंध्र प्रदेशच्या जनतेचा हक्क त्यांना द्यावा लागेल असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
टीडीपीच्या कार्यकर्त्यांनी आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा यासाठी संसदेच्या परिसरातही आंदोलन करण्यात आले. आंध्र प्रदेशासंदर्भात सरकारने जी आश्वासने दिली ती पाळलेली नाहीत. ती पाळावीत ही देखील आमची अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया टीडीपीचे नेते जयदेव गाला यांनी दिली. तर टीडीपीचे खासदार शिव प्रसाद यांनी कृष्णाच्या रुपात संसदेत प्रवेश केला आणि आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा दिला जावा यासाठी २०१४ पासून संघर्ष सुरु आहे. मात्र याबाबत केंद्र सरकारने कोणताही निर्णय अद्याप पर्यंत घेतलेला नाही. अशात आंध्र प्रदेशात सत्ता आली तर आम्ही या राज्याला विशेष राज्याचा दर्जा देऊ असे आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले आहे.