नवी दिल्ली : कोरोनाचा कहर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. करोनाग्रस्तांची देशातली संख्या ५०३ वर पोहचली आहे. तर महाराष्ट्रात ही संख्या १०१ वर पोहचली आहे. तर करोनामुळे आत्तापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चाललली आहे. त्यामुळे चिंतेचं वातावरण पसरलं आहे. साताऱ्यात १ नवा रुग्ण आणि पुण्यात ३ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातली करोनाग्रस्तांची संख्या १०१ झाली आहे. महाराष्ट्रानंतर सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये आढळले. केरळमध्य ६० च्यावर रुग्ण संख्या झाली आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ३० राज्यं लॉकडाउन करण्यात आली आहेत. तर महाराष्ट्र आणि पंजाब या दोन्ही राज्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
दरम्यान केंद्र सरकारने व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक कठोर निर्बंध लावले आहेत. नियमांचं पालन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असंही सांगण्यात आलं आहे. काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असं स्पष्ट केलं आहे.
करोनाचा धोका टाळण्यासाठी देशभरातल्या ५४८ जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन करण्यात आलं आहे. कुणीही घराबाहेर पडू नये असं आवाहन वारंवार करण्यात येतं आहे. महाराष्ट्र आणि पंजाब या दोन राज्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं होतं. आज पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत.