भोपाळ : मध्य प्रदेश सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भय्यू महाराजांसह अन्य चौघा आध्यात्मिक गुरूंना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला आहे. काँग्रेसने या निर्णयावरून सरकारला टार्गेट केले आहे.
सामान्य प्रशासन विभागाने भय्यू महाराज, नर्मदानंद महाराज, हरिहरानंद महाराज, कॉम्प्युटर बाबा, पंडित योगेंद्र महंत आदींना राज्यमंत्रिपदाचा दर्जा बहाल केला आहे. नर्मदा नदी संवर्धनसंदर्भातील समितीवर या आध्यामिक गुरूंची नियुक्ती केली आहे. त्यामुळे त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात येत आहे. ३१ मार्च रोजी हा निर्णय घेण्यात आला आहे.
या वर्षाखेरपर्यंत मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. आध्यात्मिक गुरूंना समाजात आदर आहे. निवडणुकीमध्ये त्यांच्या नावाचा लाभ घेण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची टीका काँग्रेसने केली आहे. भाजपकडून गिमिक्स केले जात असल्याचा आरोपही काँग्रेस नेत्यांनी केला.