हैदराबाद: अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. हा वाद सामोपचाराने मिटवण्याचा सल्ला कोर्टाने दोन्ही पक्षकारांना दिला आहे. तर दुसरीकडे या मुद्द्यावर कोणताच समझोता होणार नाही, असं वक्तव्य एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केलं आहे.
असदुद्दीन ओवेसी यांनी हैदराबादमध्ये एका बैठकीत अयोध्येतील वादावर आपली भूमिका मांडली. तीन तलाक किंवा बाबरी मशीद या दोन्ही मुद्द्यांवर समझोता न करण्यावर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ठाम आहे. बाबरी मशिदीच्या मुद्द्याबाबत कोणताही समझोता होऊ शकत नाही. तेथे मशीदच राहील, असं ओवेसी म्हणाले.
दरम्यान, सुप्रीम कोर्टात गुरुवारी अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणी सुनावणी झाली. हे प्रकरण श्रद्धेने नव्हे तर, जमिनीचा वाद असल्यासारखाच हातळणार असल्याचं सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ मार्चला होणार असल्याचं स्पष्ट केलं.