नवी दिल्ली : तात्काळ तिहेरी तलाक विरोधी विधेयक राज्यसभेत रखडलं आहे. तीन खासदारांच्या निरोप समारंभामुळे या विधेयकाचा संसदेत खोळंबा झाला. गेल्या तीन दिवसांपासून या विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरु आहे. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आज तरी हे विधेयक मंजूर होईल, अशी आशा होती. मात्र राज्यसभेच्या तीन खासदारांचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांना निरोप दिला जाणार आहे. त्यातच अधिवेशनाचं कामकाज संपेल. त्यामुळे हे विधेयक मंजूर होण्यासाठी पुढच्या अधिवेशनाची वाट बघावी लागणार आहे.
तात्काळ तिहेरी तलाक विरोधी विधेयकामध्ये नवऱ्याला तीन वर्षांच्या शिक्षेबाबत काँग्रेसने आक्षेप नोंदवले होते. हे विधेयक निवड समितीकडे पाठवण्याचीही मागणी काँग्रेसने केली होती. यात काँग्रेसने १७ सदस्यांची नावंही सुचवली आहेत. मात्र या समितीलाच भाजपचा विरोध आहे.
काँग्रेस पक्षाची भूमिकाच या विधेयकाचं भविष्य निश्चित करु शकते. कारण, हे विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर झालं आहे. त्यातच सध्या मोदी सरकारच्या विरोधासाठी विरोधी पक्षांनी मोट बांधली आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसवरही या विधेकावरून दबाव वाढला आहे.
राज्यसभेतील पक्षीय बलाबल
भाजप : ५७
काँग्रेस :५७
समाजवादी : १८
एआयएडीएमके : १३
तृणमूल काँग्रेस : १२
बिजू जनता दल : ८
सीपीआयएम : ७
जेडीयू : ७
राष्ट्रवादी काँग्रेस : ५
बसपा : ५
डीएमके : ४
शिवसेना :३
सीपीआय :१