नवी दिल्ली- गुजरातमधील दलित नेते जिग्नेश मेवाणींनी चिथावणीखोर भाषणामुळे कोरेगाव भीमा येथील हिंसाचार घडला, असा आरोप होतो आहे. पण या घटनेला त्यांना दोषी धरता येणार नाही. ज्यांनी दलित कार्यकर्त्यांवर हल्ला केला, त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल करायला हवेत, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ‘मुंबई मिरर‘ला दिलेल्या मुलाखतीत रामदास आठवले यांनी हे वक्तव्य केलं आहे.
हिंसाचाराच्या घटनेमागे पेशव्यांचे समर्थक किंवा ब्राह्मणांचा हात नाही. घटना घडली त्यावेळी गावात त्यांची उपस्थिती लक्षणीय नव्हती, हे लक्षात घ्यावे. तर तिथे स्थानिक मराठेच होते. काही मुद्द्यांवरून गैरसमज पसरले होते. त्यामुळे तणाव निर्माण झाला. आता प्रकरण निवळलं आहे, असं रामदास आठवले यांनी म्हंटलं. गुजरातमधील दलित नेता जिग्नेश मेवाणींच्या चिथावणीखोर भाषणामुळे हिंसाचार घडला, असा आरोप होतो आहे. पण या घटनेला त्याला दोषी धरता येणार नाही. ज्यांनी दलित कार्यकर्त्यांवर हल्ला केला, त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल करायला हवेत, अशी मागणीही त्यांनी केली.
‘आमच्या कार्यकर्त्यांवर काही स्थानिक मराठ्यांनी हल्ला केला असण्याची शक्यता आहे. आमच्या संयमी कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्यांना पोलिसांनी शोधून काढावं, अशी मागणी यावेळी रामदास आठवले यांनी केली. २०१६ मध्ये घडलेल्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणापासून दोन्ही समाजांमध्ये तणावाचं वातावरण आहे. आम्ही मराठा आरक्षणाला नेहमीच पाठिंबा दिला आहे. रिपब्लिकन पक्षाची मराठा आघाडी आम्ही सुरू केली, असं स्पष्टीकरण रामदार आठवले यांनी दिलं आहे. समाजातील प्रत्येकाला आपल्या सोबत पुढे घेऊन जायचं आहे, असंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी बोलायचे, असंही रामदास आठवले यांनी म्हंटलं.