नवी दिल्ली : गुजरातच्या निवडणुकीचे पडसाद आता राजधानी दिल्लीतही उमटलेत, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदान केल्यानंतर परत जाताना गुजरातमध्ये रोड शो केला आणि इकडे दिल्लीत वादळ निर्माण झालं. पंतप्रधानांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगावर मोर्चा काढला एवढंच नाहीतर निवडणूक आयोगाच्या कार्यालयाला घेराव देखील घातला.
पोलिसांनी तात्काळ आंदोलकांना ताब्यात घेतलं आणि नंतर सोडून दिलं. निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या हातातलं बाहुलं झालं असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय तर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी आयोगात धाव घेत आपलं म्हणणं सादर केलं.
राहुल गांधींनी साधी मुलाखत दिली तर आयोग त्यांना कारणेदाखवा नोटीस पाठवतं पण त्याचवेळी पंतप्रधान मोदींनी मतदानाच्या दिवशी रोड शो करूनही आयोग त्यांच्यावर काहीच कारवाई का करत नाही ? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केलाय. पंतप्रधानांच्या राजकीय दबावामुळेच आयोग भाजपविरोधात कारवाई करत नसल्याचा आरोप काँग्रेसने केलाय.