मुंबई : शिवसेना भाजपा युतीच्या वेळी सत्तेच्या वाटपाबाबत जे ठरलं होत तोच प्रस्ताव, नव्या प्रस्तावाची गरज नाही. अशी रोखठोख भूमिका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज बुधवारी पत्रकार परिषदेत मांडली.
संजय राऊत यांनी सांगितले की, महाराष्ट्रात शेतकऱ्यांवर संकट ओढवलं आहे. मराठवाड्यात उद्धव ठाकरे गेले होते. तसंच आदित्य ठाकरेही अनेक भागांमध्ये गेले होते. शेतकरी आणि कष्टकरी शिवसेनेकडे आशेने पहात आहेत. काहीही झालं तरीही चालेल मात्र मुख्यमंत्री शिवसेनेचाच हवा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
तसंच आता नव्याने काय सांगायचं? कुठलाही नवा प्रस्ताव नाही जे आधी ठरलंय तेच शिवसेनेचं म्हणणं आहे. निवडणुकीपूर्वीच सत्तेत समसमान वाटा यावर सहमती झाली होती. आता भाजपाला शिवसेना कोणताही नवा प्रस्ताव पाठवणार नाही. राष्ट्रपती राजवट जर महाराष्ट्रात लागू झाली तर हा अधर्माचा विजय असेल असाही टोला संजय राऊत यांनी लगावला. मतदारांसोबत जनतेवर अन्याय होईल असंही संजय राऊत म्हणाले.