मुंबई : शिवसेना सत्तेतील समसमान वाटपावरून आक्रमक झाली आहे. त्यावरून भाजपच्या गोटात धाकधूक वाढली असून, भाजपानेही त्यांच्या आमदारांची ३० तारखेला विधान भवनात बैठक बोलावली आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तसंस्थेला माहिती दिली. आजच मातोश्रीवर शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपाकडून सत्तेचं सूत्र लेखी स्वरुपात घ्यायचं यावर शिक्कामोर्तब झालं. तसंच अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री झालाच पाहिजे अशीही मागणी विजयी आमदारांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंकडे केली.
या पार्श्वभूमीवर भाजपाच्या अडचणी वाढल्या आहेत. शिवसेना भाजपा युती असूनही शिवसेनेच्या व भाजपच्या जागा कमी झाल्या आहे. विशेष म्हणजे शिवसेना निकालाच्या दिवसापासून आक्रमक झाल्याची दिसून येत आहे. त्यामुळे भाजपच्या बैठकीत काय ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिवसेना अडीच अडीच वर्षे या फॉर्म्युलावर ठाम आहे. यामुळे भाजपला शिवसेनेच्या अटी मान्य कराव्या लागतील.
भाजपाला १०५ जागा मिळाल्या आहेत. बंडखोरी केलेल्या आमदारांपैकी १५ आमदार आमच्या संपर्कात आहेत असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. असं असलं तरीही बहुमतासाठी लागणारा १४५ आकडा भाजपाला गाठणं कठीण आहे त्यामुळे शिवसेनेला सोबत घेऊनच भाजपाला जावं लागणार आहे.