नवी दिल्ली : वाल्मीकी समुदायावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेता सलमान खानला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला. याप्रकरणी न्यायालयाने एफआयआर आणि सर्व कायदेशीर कारवाई करण्यास स्थगिती दिली आहे. आता पुढील सुनावणी २३ जुलैला होणार आहे. सलमानने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती.
माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाने यावर विचार करत सलमानविरोधात तात्पुरता कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश दिले. ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, सलमान खानने वाल्मिकी समाजाबद्दल अपमानजनक वक्तव्य केले होते. त्यानंतर वाल्मिकी समुदायाने नाराजी व्यक्त करत अनेक ठिकाणी सलमान विरोधात एफआयआर दाखल केले होते.