Monday, May 6, 2024

राज बदलले!

हाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरुन गुजरातचा विकास-पाहणी दौरा करणारे राज ठाकरे, २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधानपदासाठी मोदींना राजकीय पाठिंबा जाहीर करणारे राज ठाकरे आणि दुस-या बाजूला काल शिवाजी पार्कवर जनसमुदायासमोर बोलताना ‘मोदीमुक्त भारतासाठी सर्वच्या सर्व विरोधकांनी एकत्र यावं असं आवाहन करणारे राज ठाकरे यांनी युटर्न घेऊन मोदी प्रेम उरले नाही असे जाहीर करुन टाकले. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान व्हायला हवेत असं जाहीर वक्तव्य करणारे राज ठाकरे ‘मोदीमुक्त’ भारताची जाहीर घोषणा करण्यापर्यंत कसे बदलले, का बदलले या प्रश्नांची उत्तरं त्यांनीच कालच्या त्यांच्या तब्बल एक तास २० मिनिटांच्या भाषणात दिली. त्यांची ही संपूर्ण मांडणी ठोस अभ्यासावर, निरीक्षणांवर आधारित होती. ज्या विषयांवर-मुद्द्यांवर चर्चा होताना दिसते, ते मुद्दे राज यांनी प्रथमच राजकीय चर्चाविश्वाच्या केंद्रस्थानी आणले. त्यामुळेच कदाचित, त्यांच्या वैचारिक विरोधकांनाही त्यांची ही मांडणी भावल्याचं समाज माध्यमांमध्ये दिसतंय. जस्टिस बी. एच लोया यांच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण समाजस्मृतीतून विस्मरणाच्या वाटेवर असतानाच या प्रकरणाच्या खटल्यासंबंधीची अत्यंत वेगळी व महत्वाची माहिती राज यांनी मांडली. “जस्टीस लोयांच्या मृत्यूची केस एका महिला न्यायाधीशाकडे होती, त्या निस्पृह होत्या म्हणून त्यांच्याकडून केस काढून घेतली असं वाटू नये म्हणून महाराष्ट्रात १०० न्यायाधीशांच्या बदल्या केल्या” ही राज यांनी उघड केलेली बाब निश्चितच खळबळजनक आणि चिंताजनक आहे. त्याहून महत्वाचं म्हणजे न्यायव्यवस्थेला स्वत:च्या मुठीतच ठेवू इच्छिणा-या सरकारचं राक्षसीरुप दाखवणारी आहे. हुकूमशाही मनोवृत्तीचं मोदी-शहांचं नेतृत्व आणि भाजपचं सरकार गेली चार वर्षं न्यायव्यवस्था तसंच पत्रकारिता या लोकशाहीच्या दोन स्तंभांनाच धडका देत असल्याचं सांगायलाही राज विसरले नाहीत. मोदी-शहा ही जोडी हिटलरच्या प्रचारतंत्राचा वापर करत असल्याचं फक्त सांगून राज थांबले नाहीत, तर त्यांनी त्याची अनेक उदाहरणंही दिली. इलेक्ट्रॉनिक्स मीडियामधल्या काही पत्रकारांवर सरकारी यंत्रणांकडून टाकला गेलेला दबाव याबाबतही राज ठाकरे बोलले. मीडियाला नियंत्रित करण्याचं भाजप सरकारचं धोरण स्पष्ट करताना राज य़ांनी “मेट्रोच्या विरोधात कोणत्याही बातम्या द्यायच्या नाहीत असे सक्त आदेश आहेत असं मला काही पत्रकारांनी सांगितलं” असंही बेधडकपणे सांगून टाकलं. भाजप सरकार केवळ मीडियाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत नाहीए तर, जनतेला सरकारी माहिती उपलब्धच होणार नाही याची पूर्ण दक्षता घेत असल्याचंही राज यांनी सांगितलं. त्यासाठी त्यांनी उदाहरण दिलं ते बेरोजगारांच्या नोंदणीचं. बेरोजगारांची नोंदणीच करायची नाही असा आदेश केंद्र सरकारने काढल्यामुळे नक्की किती बेरोजगार आहेत याचा आकडा कधीच कळणार नाही, असं राज म्हणाले. दरवर्षी दोन कोटी रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या घोषणा – आश्वासनं देणा-या सरकारचं पितळ उघडं करणारा हा मुद्दा आहे. मंत्रालयात आत्महत्या करणारे वयोवृद्ध शेतकरी धर्मा पाटील यांची केसस्टडी मांडत राज यांनी राज्यातील शेतजमीन विक्रीतील दलालांचा भांडाफोड केला. वसईतील वनजमिनींवर हजारो अनधिकृत चाळी बांधणा-या परप्रांतीयांच्या रॅकेटचाही त्यांनी पुराव्यांसह उल्लेख केला. राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोहोंवर टीका करताना आपलं कोणतंही टीकास्त्र वाया जाणार नाही, याची पुरेपूर दक्षता राज यांनी कालच्या भाषणात घेतली. नोटबंदी, मेक इन इंडिया, मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या फसव्या घोषणांपासून ते ५५० कोटींची राफेल विमानं खरेदी करण्यासाठी १६०० कोटी रुपये मोजणा-या भाजप सरकार आणि अनिल अंबानींचा रिलायन्स ग्रुप यांचं साटंलोटंपर्यंतच्या अनेक गोष्टींचा राज यांनी आपल्या भाषणात समाचार घेतला, पण खरा राजकीय षटकार ठोकला तो राममंदिराच्या मुद्द्यावरुन नजीकच्या भविष्यात देशात हिंदू-मुस्लीम दंगली घडवण्याचा भाजपचा डाव आहे, हे सांगून. “राम मंदिर मलाही हवंय, पण निवडणुका जिंकण्यासाठी राम मंदिराच्या नावाखाली दंगली होणार असतील तर मंदिर पुढच्या वर्षी निवडणुकांनंतर झालं तरी चालेल”, हे राज यांचं म्हणणं त्यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीची साक्ष देणारं आहे. भाजपचं बनावट धर्मांध राजकारण आणि कांग्रेसची बेगडी धर्मनिरपेक्षता या दोन्हींपेक्षा माझी भूमिका वेगळी असल्याचं ठसवण्याचा प्रयत्न राज यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर टीका करुन राज थांबले नाहीत, काँग्रेसविरोधात मोदींनी ज्या प्रतिमांचा वापर केला त्या प्रतिमांना मराठी समाजमनातून उखडून टाकण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. पंडित नेहरुंवर टीका करताना एरवी भाजपसह देशातील समस्त उजव्या राजकीय पक्षांना जवळचे भासणारे आणि विशेषत: नरेंद्र मोदी यांचे आदर्श सरदार वल्लभभाई पटेल हेसुद्धा महाराष्ट्रविरोधी होते, असा मुद्दा राज य़ांनी आचार्य अत्रेंच्या अग्रलेखाचा हवाला देऊन मांडला. मुंबई महाराष्ट्राला मिळू नये यासाठी नेहरूंवर वल्लभभाई पटेलांचा दबाव होता, असं सांगत “जी मुंबई गुजरातच्या हातातून गेली ती परत मिळवण्यासाठी बुलेट ट्रेन हा प्रकल्प आहे”, अशी मांडणी करत राज यांनी बुलेट ट्रेनला असलेला त्यांचा विरोध पुन्हा एकदा ठामपणे अधोरिखित केला. १९७५ मध्ये इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणीनंतर जयप्रकाश नारायण यांनी देशातल्या सर्व विरोधी पक्षांना इंदिरा गांधींच्या काँग्रेसविरोधात एकत्र येण्याचं आवाहन करताना दुस-या स्वातंत्र्याची हाक दिली होती. १९७७मध्ये आलेलं जनता सरकार हे जेपींच्या नवनिर्माण आंदोलनातून जन्मलेलं होतं. त्यानंतर ४२ वर्षांनी मोदींच्या भाजप सरकारविरोधात सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याचं आवाहन करत तिस-या स्वातंत्र्याची हाक राज ठाकरे यांनी दिली आहे. त्यांच्या या हाकेला इतर पक्ष प्रतिसाद देतील का? २०१९ मध्ये खरोखरच भाजपचा पराभव झाला तर त्याचं श्रेय राज ठाकरेंना मिळेल का? या प्रश्नांची उत्तरं येणारा काळच देईल. परंतु राज यांच्या कालच्या भाषणावरुन त्यांच्यात बदल दिसून आला. तो बदल कितीकाळ टिकेल हे वेळे ठरवेल.

वैदेही ताम्हण

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments