पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत. सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले. सत्ताधारी भाजपदेखील आपल्या मूळ विचारधारेकडे वळण्याचा विचार करत आहे. त्याअनुषंगाने २०१९ च्या निवडणूक प्रचाराची सुरवात भाजप ‘यज्ञाने’ करणार आहे. आठवडाभर चालणाऱ्या महायज्ञाचे नाव ‘राष्ट्ररक्षा यज्ञ’ असणार आहे. भाजपाने आधी सत्तेसाठी राम मंदिरचा मुद्दा हातात घेऊन सत्ता हस्तगत केली होती. आता सत्ता पुन्हा काबीज करायची आहे. देशात जातीय ध्रुवीकरण वाढले आहेत. शेतकरी, मजुर, कर्मचारी, व्यावसायिक सर्वच नाराज आहेत. जाती धर्मामध्ये दररोज तेढ निर्माण होऊन हिंसक घटना घडत आहेत. सरकारने दिलेले एकही आश्वासन पाळले नाही. सरकारमधील मंत्री तसेच पदाधिकारी यांच्यामध्ये सरकारबद्दलच प्रचंड असंतोष आहे. माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिंन्हा,राम जेठमलानी सारखे नेते उघडपणे वारंवार सरकारच्या चुकांवर व हिटलरशाही वागणूकीवर तोफ डागत आहेत. त्यामध्ये आणखीभर पडली ती गल्लीतल्या व राज्यातल्या नेत्यांची. भाजपचा महायज्ञ ८ मार्चपासून १५ मार्चपर्यंत चालेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या यज्ञात पहिली आहुती देतील. यज्ञातून वातावरणाची निर्मिती होईल आणि त्याचा निवडणुकीसाठी लाभ घेता येईल, असा भाजप नेत्यांचा कयास आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शाहा हे खुद्द सातही दिवस यज्ञाच्या स्थळी असतील. याशिवाय केंद्रीय मंत्री, भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री, खासदार आणि राज्यमंत्रीदेखील यज्ञाला हजेरी लावणार आहे. धार्मिक विधी परंपरेनुसार चालणे यामध्ये चुकीचे काहीही नाही. परंतु देवाधर्माचा सोंग करुन चालत नाही. त्याला मन स्वच्छ आणि शुध्द असायला हवेत. देशात ध्रुवीकरणाची जी परिस्थिती झाली आहे ती परिस्थिती स्वातंत्र्यानंतर कधीही झाली नव्हती. यज्ञासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हेही हजेरी लावण्याची शक्यता आहे. लाल किल्ल्याच्या मैदानात होणाऱ्या यज्ञात १०८ कुंड तयार केले जाणार आहेत. या यज्ञात दररोज ५० हजार नागरिक सहभागी होतील आणि दररोज सायंकाळी विविध राज्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतील. हे सर्व करुन पक्षाची व सरकारची प्रतिमा बदलणार आहे का? पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच पक्षाची संबधित विविध संघटनेच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना सत्तेचा माज आलेला आहे. मग्रुरी वाढलेली आहे. त्यांना शांत करण्यासाठी पक्षाचा कोणताही नेता तोंडातून ब्र सुध्दा काढत नाही. याचाच अर्थ त्यांना पक्षातून पाठबळ मिळाल्यामुळे सर्व काही मस्तवालपणा सुरु आहे. कोणताही नेता आज मग्रुरीचीच भाषा बोलत आहे. भाजपा किंवा सरकारच्या बद्दल कुणीही काही मत व्यक्त केले की,त्याला राष्ट्रद्रोहीचा शिक्का मारला जातो. त्याला धमकी दिली जाते. अशा गलिच्छ प्रकारे राजकारण सुरु असून देशात आणीबाणी सारखी परिस्थिती निर्माण झाली. लोकशाही संपूर्णपणे धोक्यात आली. यामुळे भाजपाच्या मंडळींनी आधी मन,स्वच्छ करावेत आणि त्यानंतर धार्मिक विधी पार पाडावेत अन्यथा देवही माफ करणार नाही.
वैदेही ताम्हण
मुख्य संपादक